Agniparva (अग्निपर्व)

250

Availability: 98 in stock

SKU: 9789394266032 Category: Tag:

अग्निपर्व म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने डागलेल्या तोफगोळ्यांमुळे रायगडाने घेतलेला पेट. स्वराज्यवैभवाचे राणीव भोगणाऱ्या रायगडाची ती दुरवस्था. अशा या गडावरील अग्नी तांडवाचे वास्तव म्हणजे “अग्निपर्व”. कंपनीच्या पारतंत्र्याला न जुमानता देशातील तरुणांना, क्रांतिकारकांना आणि समाजसुधारकांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारा रायगड, त्याचे हे “स्वातंत्र्यपर्व”.

१८१८ मध्ये बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे राहणाऱ्या सदाशिवचे कंपनीत कारकुनी पदावर कामास रुजू झाला. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये कंपनीत नव्याने भरती होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हालचाली त्याने टिपल्या. सदाशिवला सुरुवातीपासूनच कंपनीत काहीतरी काळंबेरं शिजतंय याचा सुगावा लागला होता, पण नेमकं काय चालू आहे, हे मात्र त्याला कंपनीने कधीच जाणवू दिले नव्हते. कंपनीच्या काळ्या कामात आणि काळ्या पैशात सदाशिवच्या बाबांचा मोठा पुढाकार होता. आपल्याच घरात इंग्रजांच्या गुलामगिरीची भाकरी भाजली जाते या एका गोष्टीची सदाशिवला नेहमी खंत वाटत होती आणि त्यामुळे तो अधिकच चिंतेत असे.

परंतु सदाशिवचे राष्ट्राप्रती, देशाप्रती आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या आस्थेमुळे, प्रेमामुळे तो कंपनीच्या कपटी कारस्थानात कधीच सहभागी होत नव्हता. उलट कंपनीत काय खलबतं होत आहेत ते शोधण्यासाठी कधी पहिल्या प्रहरी, तर कधी भरदिवसा तो कंपनीत शोधाशोध करीत असे. काही महिने अशाच गोष्टींचा शोध घेण्यात निघून जातात. दरम्यान सदाशिवच्या बाबांना कंपनीकडून महाड येथे नजरकैद होते. कंपनीच्या कपटी राजकारणाला आपले बाबा बळी पडले, ही गोष्ट सदाशिवला आतून खात होती. त्यातच अचानक एके दिवशी कंपनीत वरिष्ठ अधिकारी रायगडाच्या पाडावाचा विजय साजरा करू लागले. महाड येथे मोठे युद्ध झाले असे त्याच्या कानी पडले. त्याने क्षणाचाही विलंब न करता सरळ बॉम्बेपासून रायगडपर्यंत मजल दरमजल करत प्रवास सुरु केला. रायगड किल्ला पाहणे अशी इच्छा सदाशिवने एकदा व्यक्त केली होती, पण काही केल्या बाबांकडून ती पूर्ण झाली नव्हती. आता जेव्हा तो स्वतः रायगडाच्या घेऱ्यात आला आहे हे समजल्यावर त्याने गड पाहायचाच असं ठरवलं आणि कोणताही विचार न करता गड चढण्यास सुरुवात केली.

गडावर पुढे काय झाले? त्याला भेटलेले गृहस्थ कोण होते? अग्निपर्व म्हणजे काय? किल्ले रायगड आणि अग्निपर्व याचा नक्की संबंध तरी काय? असे अनेक प्रश्न या कथेतून उलगडत जातात.

पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा आहे.
सदाशिवला रायगड चढण्यापासून ते गडफेरी पूर्ण होईपर्यंत आलेले अनुभव सांगणारी कथा म्हणजे “अग्निपर्व”.

Weight 230 g
Number of Pages

268

Writer

Mayur Khopekar

Reader's Reviews

  1. स्वप्निल खाडे
    फेसबुकला मयूर दादाची या पुस्तकाबद्दलची पोस्ट पाहिली, आणि पुस्तक वाचण्याची फार ईच्छा झाली. दादाला सांगून पुस्तक मागवलं आणि दीर्घ प्रतिक्षेनंतर २६ एप्रिलला पुस्तक भेटलं..
    पुस्तक कधी एकदा वाचतोय असं झालं होतं. दोन दिवस वेळ न मिळाल्याने तिसऱ्या दिवशी पुस्तक वाचायला घेतले. पुस्तकातील पात्र दादाच्या लेखणीने एवढी जिवंत वाटतात की, ते कसे दिसत असतील, त्याचं चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं..
    सदाशिव, त्याचे बाबा, आई, आजोबा, सायमन, विठ्ठलकाका, आनंदा, वस्तीतले बाबा, महादू, आबा आणि इतर! सर्व पात्रांना अगदी डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक वाचताना कधी अश्रू, कधी दुःख, कधी राग तर कधी हसू अश्या संमिश्र भावना मनी दाटून येत होत्या. आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येतात आणि आपण निराश होऊन जातो. पण सदाशिवच्या आयुष्यात एवढे काटेरी प्रसंग असताना देखील त्याच्या मदतीला कित्येक व्यक्ती उभ्या राहिल्या, आणि त्यामुळे त्यातून त्याची सुटका होत गेली, त्याला नवे मार्ग सापडतं गेले.
    सदाशिवचे बाबा…! सगळ्यात भावनिक विषय हाच होता माझ्यासाठी..! हे पात्र अगदीच जवळचं वाटलं. त्याच्या बाबांमध्ये आणि माझ्या बाबांमध्ये बराच सारखेपणा जाणवला. शेवटी त्याच्या बाबांना बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली. त्याच गोष्टी माझ्या बाबांना उमगल्या तर तो दिवस माझ्यासाठी एक सोहळा असेल..! 🙂
    लिंगोबाच्या पायथ्याला राहणाऱ्या आजीने दिलेला कोरा चहा असो किंवा त्या दोन भाकऱ्या, त्या खाताना त्याची किती घालमेल होत होती, या घटना फारच जिवंत वाटत होत्या.
    पुस्तक वाचता वाचता त्या काळात पोहोचलो आणि याचे श्रेय मयूर दादा तुला आणि तुझ्या लेखनाला जाते. शेवट फारच हृदयस्पर्शी होता. पहिल्यांदाच आबा शब्द ऐकला, तेव्हा साक्षात महाराजांची प्रतिमाच डोळ्यांसमोर उभी राहिली. आबांसोबत गड पाहणं ही कल्पनाच किती भारी आहे..! त्यांचं ते बोलणं वाचताना भरून येत होतं..! रायगडावर चालू असलेला अग्निपर्व शेवटच्या भागांमध्ये वाचताना जणू रायगडावरचं गेलोय अस वाटत होतं. जगदीश्वराच्या मंदिरातील थंडावा घरी बसून अनुभवता आला.
    हे पुस्तक संपूच नये, सतत वाचत राहावसं वाटत होतं. याच उत्कंठेने पुस्तक वाचून संपलं आणि अग्निपर्वाचा शेवट झाला. मयूर दादा खूप छान कथा लिहिली आहेस. हे पुस्तक नक्की वाचा मित्रांनो..!
  2. वैभव पाटील
    एखाद्या खास मित्रापासून ते लेखकापर्यंतचा एखाद्या व्यक्तीचा प्रवास बघायला मिळणे, एखाद्या रायगडावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून एक पर्व लिहिलं जाणं, आणि रायगडावरच्या प्रेमाला अजून उभारी मिळणं, अशा अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे मित्रा, तुझ्या हातून लिहिलेलं हे “अग्निपर्व” पुस्तक.
    आधी आजोबा आणि नंतर वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामाला, त्यामुळे सदाशिव नावाच्या या पुस्तकाच्या पात्राला कंपनीत जाण्याची मुभा मिळते. आजोबांना शिवराय आणि स्वराज्य याबद्दल विशेष प्रेम आहे, पण सदाशिवचे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला गैरकामात मदत करतात, सुंदर हस्ताक्षर असल्यामुळे त्याची कंपनीमध्ये होणारी वाहवा, पत्र व्यवहार बघत असताना कंपनीचं रायगड पाडण्याचं धोरण लक्षात येणे, त्या काळात नवीन आलेले इंग्रजी अधिकारी, त्यांची कार्यनीती, कंपनीचं वातावरण आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य, रायगड आणि त्याच्या भोवती घडणाऱ्या घटना यांचा सुरेख मिलाफ लेखनाने या पुस्तकात मांडला आहे..
    रायगड जेव्हा इंग्रजांनी जिंकला तेव्हा तो कसा जळत असेल? अख्या हिंदुस्थानाच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारा हा रायगड एवढा शांत कसा जळाला असेल? सदाशिव आणि आबा रायगडावर फिरताना रायगड कसा दिसत असेल?
    मुंबई ते महाड सदाशिवने केलेला प्रवास प्रचंड भारी लिहिला आहे. जळणारा रायगड खूप भावुक लिहून मनात एक प्रश्नाचं मोठं वादळ निर्माण केलेलं आहे. सुरुवातीपासून शेवटापर्यंत नक्की काय होतंय याची उत्सुकता मनात कायम ठेवत लेखकाने पुस्तकात गुंतवून ठेवलं आहे.
    रायगडची शांतता अनुभवण्यासाठी प्रत्येकाने नक्की वाचावं असं पुस्तक.
  3. अभिषेक वारंग
    सुरवातीला तुझे blogs वाचायचो…
    लेखनशैलीतलं कौशल्य आधीपासूनच कोणत्याही वाचकाला रुळवेल असंच.. तुझं लिखाण आणि रायगडाविषयी अभ्यास पाहता, वाटत होतं तू पुस्तक लिहावं, काहीवेळा बोलूनही दाखवलं…
    गेल्या महिन्यात कादंबरीचं मुखपृष्ठ स्टेटसला पाहिलं, आता काहीतरी भारी वाचायला मिळणार याचा आनंद झाला. राखीव करून ठेवलेली प्रत थेट लेखकाकडून हस्ताक्षर करून त्याच्याच हातून मिळण्याचा आनंद वेगळाच असतो बघ…

    रायगडचा पाडाव… विषय तसा गंभीर आणि भावनिक, लिहिताना नक्कीच दडपण येण्यासारखा, पण ते तुझ्या लेखणीतून नीट निभावलंस. आधी आजोबा आणि मग वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत एका प्रतिष्ठित पदावर असल्याकारणाने वडिलांचा मदतनीस म्हणून सदाशिवला कंपनीत जायला मिळणं, त्याच्या कामावर आणि सुंदर हस्ताक्षरावर खुश होऊन कंपनीने त्याला वेतनी रुजू करणं, पण त्याची कंपनीत चाललेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या देशाविरुद्ध शिजणाऱ्या कटकारस्थानामुळे आणि वडिलांची इंग्रजांना असलेली सोबत यामुळे होणारी घुटमळ, त्याच कारणास्तव आजोबांनी त्याकाळी सोडलेली नोकरी आणि आजोबांचे छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्ययुद्ध याबद्दल असणारे प्रेम, याची सदावर पडलेली छाप आणि इंग्रजांच्या कटाची माहिती मिळवण्यासाठीची धडपड आणि आलेलं यश-अपयश हे सगळं अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतं हे पुस्तक.

    सदाचं मुंबई ते रायगड प्रवास वर्णन वाचताना स्व:नुभव घेत असल्याचा भास होतो. ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती गेलेला रायगड आणि इंग्रजांनी केलेली हानी वाचताना मन भावुक झाल्याशिवाय राहत नाही.
    सदाचं मुंबई ते रायगड प्रवास वर्णन आणि सदा-थोरल्या आबांची रायगड भेट आणि स्थलदर्शन हा पुस्तकातील सर्वात आवडलेला भाग आहे.
    बाकी लावलेलं हे छोटं रोपटं पुढे वटवृक्ष होऊदे आणि तुझं लिखाणाचं ‘अग्निपर्व’ सदैव ज्वलंत राहूदेत, या शुभेच्छा…

  4. आकाश जोगळे
    पुस्तकातील सदा हे पात्र माझ्या व्यक्तिमत्वाशी अगदी तंतोतंत जुळवून येत आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना जणू काही मी मलाच वाचत आहे, असे जाणवले.
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us